Monday, 4 May 2020

सह्याद्रीतील पहिले पाऊल

 मी लहान असताना माझे मोठे भाऊ त्यांचे मित्र ट्रेकिंगला जातात हे बघितलं होतं. ट्रेकिंग म्हणजे काय माहित नव्हतं पण त्यांच्या तोंडून गोरखगड, माहुली, हरिश्चंद्रगड अशी नावं ऐकली होती आणि त्या नावांबद्दल मनात कुठेतरी एक आकर्षण निर्माण झालं होतं. तिथे जाण्याची खूप इच्छा होती. पण योग काही येत नव्हता. एकदा योग आला. मी साधारण आठवी नववीत असेन. (१९९५-९६) तेव्हा आई बाबा काही कामानिमित्त गावाला का कुठे बाहेर गेले होते. त्यामुळे घरी आम्ही तिघे भाऊच.आमच्या घरी मी, सागर (माझा मधला भाऊ) आणि बाकीचे मित्र बसलो होतो तेव्हा प्रकाश उर्फ पक्या याने 'माहुली' किल्ल्यावर ट्रेकला जाण्याची योजना बनवली. यात मी व माझ्या वयाच्या चार पाच मित्रांना पण घेऊन जाण्याची तयारी दाखवली. प्लॅन तयार झाला. आजच रात्री निघायचं आणि उद्या रात्री परत यायचं. संध्याकाळ संपून रात्र झाली. निघायची वेळ जवळ येत होती. सगळी तयारीसुद्धा झाली पण माझा मोठा भाऊ सिद्धार्थ अजून घरी आला नव्हता. (आता सारखे तेव्हा मोबाईल नव्हते त्यामुळे कुठे आहे? कधी येणार? काहीच विचारता येत नव्हते.) रात्री निघायची वेळ झाली तरी दादा घरी न आल्याने सर्वानुमते मी घरी थांबायचं आणि सागर व ठरलेले इतर सर्व (साधारण ९-१० जण) जाणार असं ठरलं. मी व आमचा एक मित्र असे दोघे घरी थांबून बाकीचे निघून गेले. ट्रेकला जाण्याची पहिली संधी हुकली त्यामुळे सगळे गेल्यावर रडून मी बेहाल झालो होतो. साधारण पाऊण एक तासाने दादा आला. माझं रडक थोबाड पुसून लगेच सायकलवर बसवून मला स्टेशनवर घेऊन गेला. पण गाडी आणि सहकारी निघून गेले होते. ही संधी हुकल्यानंतर अजून आठ नऊ वर्ष होय नाय करण्यातच गेली.
  एक दोन संधी हुकल्यानंतर आणि बरेच प्लॅन फसल्यानंतर नोव्हेंबर २००५ मध्ये पुन्हा एक प्लॅन झाला. 'हरिश्चंद्रगड' 'Paradise of Trekers' म्हणजेच 'गिर्यारोहकांची पंढरी' अशी ख्याती असलेला किल्ला. नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात प्लॅन केला ट्रेक करायचा. प्लॅन करणाऱ्या आमच्यात एक कौस्तुभ सोडला तर सगळेच अननुभवी किंवा तुटपुंजा अनुभव असलेले होते. कौस्तुभ तेव्हा एका संस्थेबरोबर ट्रेक करायचा आणि त्यांच्या ट्रेक प्लॅनिंग कमिटीमध्ये होता. ट्रेक प्लॅन तर केला पण घरून विरोध सुरू झाला जो मला अनपेक्षित होता. कारण दोघा भावांनी ट्रेक केले होते. मग मला विरोध का करावा? कारण आता लक्षात नाही कदाचित सगळेच अननुभवी असल्यामुळे असेल पण थोडा वाद घालून का होईना पण मी जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. सामान, कपडे इत्यादी भरून बॅगा तयार केल्या. दोन दिवसाचा ट्रेक असल्याने एक दिवस आधीच बॅगा भरून ठेवल्या होत्या. ठरलेल्या दिवशी म्हणजे दि. १८ नोव्हेंबर २००५ ला रात्री ठरलेल्या वेळेस निघालो. ट्रेन पकडून कल्याणला गेलो. कल्याणहून माळशेज घाट मार्गे जाणाऱ्या बसची चौकशी करून बस पकडली. साधारण दोन अडीच तासांनी माळशेज घाटाच्या पुढेच खुबी फाटा येथे उतरलो. खुबी फाट्याला नगरच्या दिशेने तोंड केल्यास रस्त्याच्या डाव्या हाताला खिरेश्वर गावात जायला वाट लागते ती पकडली आणि चालायला सुरुवात केली. खिरेश्वर हे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गावं. खुबी फाट्यावरून पिंपळगाव जोग धरणावरून खिरेश्वरला जावं लागतं. अर्धा पाऊण तास चालून खिरेश्वरला पोहोचलो. एव्हाना रात्रीचे तीन चार वाजले असतील. दोन तीन तास झोप काढून सकाळी सहा सातला गडावर जाण्यासाठी मार्गक्रमण करायचं ठरवून तिथे एका छोट्या हॉटेलच्या बाहेरील बाकड्यांवर झोप काढली.
ठरल्याप्रमाणे सकाळी उठून गड चढायला सुरुवात केली. जसं आम्ही गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केली गावातील एक कुत्रा आमच्या मागे मागे यायला लागला. माझा हा पहिलाच ट्रेक असल्याने माझ्यासाठी हे नवीन होतं तसेच कुत्रे आणि माझा ३६चा आकडा असल्याने भीती वाटत होती. त्यामुळे आता दहा जण गडावर जाण्यासाठी निघालो. मजा मस्ती करत गड चढायला सुरुवात झाली. तोलार खिंडी मार्गे चढाव संपेपर्यंत एवढं दमायला झालं नाही पण शेवटी पाच का सात टेकड्या

पार करताना पार कंटाळा आला कधी एकदा पोहोचतोय असं झालं होतं. साधारण १०.०० - १०.३० च्या आसपास आम्ही एकदाचे गडावर पोहोचलो. एवढ्या उंचावर दगडांनी बांधलेलं सुंदर मंदिर, सुबक अशी पुष्करणी आणि कड्यात कोरलेल्या गुहा बघून आश्चर्यचकित व्हायला झालं. कारण हजारो वर्षांपासून या गडाचं अस्तित्व आहे. साडे तीन चार हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात या गडाचा उल्लेख आढळतो. असं म्हणतात की चांगदेव महाराजांनी येथे १४०० वर्ष तपश्चर्या केली. चांगदेव महाराज हे १४०० पेक्षा जास्त वर्ष जगल्याच म्हटलं जातं. (हा आता ही माहिती मला तेव्हा नव्हती. पण नंतर वाचन आणि मित्र परिवार यांच्या ज्ञानामुळे ही व अश्या अनेक गोष्टी माहिती होत गेल्या.) पण खरं सौंदर्य, खरं आश्चर्य तर बघायचं अजूनही बाकीचं होतं. आम्ही गुहांजवळ गेलो. तेव्हा गणेश गुहा रिकामी असल्याने तिथे जागा मिळाली. (या गुहेत कातळात श्री गणेशाचे १०-१२ फूट उंच सुंदर शिल्प कोरलेलं आहे.) या गुहेत थोडा आराम करून नाश्ता आटपून आम्ही हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वर, पुष्करणी हा समोर दिसणारा मनमोहक परिसर बघायला गेलो.
१) हरिश्चंद्रेश्वर मंदिर -: हरिश्चंद्रेश्वर मंदिर म्हणजे मनहरखून टाकणारी जागा. कातळात कोरलेलं मंदिर, बाजूच्या परिसरात कातळात कोरलेल्या खोल्या आणि सर्वात अदभुत या मंदिर आणि खोल्यांच्या खालती भूमिगत अमृततुल्य पाण्याचा साठा. स्थानिक लोकं असं म्हणतात याच मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौथरीच्या इथून खालती अजून एक खोली आहे त्याच खोलीत चांगदेव महाराजांनी १४०० वर्ष तपश्चर्या केली आणि 'तत्वसार' हा ग्रंथ लिहिला. 


  २) केदारेश्वर -: केदारेश्वर ही देखील येथील अप्रतिम कलाकृती. मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते, यालाच केदारेश्वराची गुहा असेही म्हणतात. या गुहेत १ मीटर उंच आणि २ मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कंबरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबांवर तोलली होती, पण सद्यस्थितीला एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोली ही आहे .खोलीच्या डाव्या हाताच्या भिंतीवर शिवपूजनाचा प्रसंग कोरलेला आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास बर्फतुल्य पाण्यातून जावे लागते. 


  ३) पुष्करणी -: काही काही शब्दच मुळी गोड असतात, कानाला सुखावणारे असतात त्यातलाच एक 'पुष्करणी'. टाके, आड, बारव, विहीर, तलाव असे काहीही म्हटले तरी ती फक्त पाणी साठवण्याची जागा एवढेच डोळय़ांपुढे येते. पण तेच ‘पुष्करणी’ म्हटले तर! हे काहीतरी निराळे नक्कीच भासते. सुखद, अलंकारिक, दैवी, पवित्र, उदात्त हेतूने निर्मिलेली असे अनेक भाव त्या जलवास्तूत उमटू पाहतात. एखाद्या देवालयासमोर, त्याच्या सान्निध्यात, त्याच्यासाठी म्हणून निर्माण केलेला जलप्राकार म्हणजे ‘पुष्करणी’! आता तिच्या नावाप्रमाणेच ती सौंदर्य ल्यायलेली असणार हे उघड! चार दिशांना कोनाडे, त्यात विविध देवतांनी वास केलेला. आतमध्ये चारही बाजूने उतरणाऱ्या पायऱ्या, फिरण्यासाठी धक्का. पुष्करणीचे हे असे थोडेसे रेखीव रूप.


एवढं बघेपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. त्यामुळे रात्रीचं जेवण बनवण्याची तयारी सुरू केली. मी जेवण बनवलं तर उगाच सगळ्यांना उपवास घडायचा. त्यामुळे मी पाणी आणायचं आणि जेवण झालं की भांडी घासण्याचं काम करायचं ठरवलं. जेवण झाल्यावर मी आणि अजिंक्य गुहेच्या बाहेर मोकळ्यावर आडवे होऊन वर आकाश बघत बसलो होतो. एवढं स्वच्छ आणि छोट्या छोट्या चमकणाऱ्या ताऱ्यांनी भरलेलं आकाश मी कधी बघितलंच नव्हतं. सगळं आटपून झाल्यावर आम्ही शेकोटी पेटवून आमच्यातील स्वप्निल कुलकर्णी (आदित्य, अजिंक्य कानेटकर यांचा मावसभाऊ) महाराजांवरील गाणी म्हणू लागला आणि आम्ही त्याला साथ देऊ लागलो. साधारण अर्धा तास गाणी म्हणून झाली असतील तेव्हा आमच्यातील कोणाचं तरी लक्ष मंदिराकडून गुहेकडे येणाऱ्या वाटेवर गेले. त्या वाटेवर अंधारात दोन डोळे चमकताना दिसले. त्याने आम्हाला दाखवलं आणि आम्ही बघत असताना त्या चमकणाऱ्या डोळ्यांच्या काही फूट पुढे अजून दोन डोळे चमकू लागले. आता मात्र आमचं घामट निघायला लागलं होतं. कारण हरिश्चंद्रगड आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा राजूर वनपरिक्षेत्रात येतो. त्यामुळे कोल्हे, तरस, रानडुकरे, बिबळ्या, ससे, भेकर, रानमांजरे इत्यादी प्राणी येथे आढळतात. सर्वांनी टॉर्च मारून बघितलं तेव्हा समजलं त्या छोट्या रानमांजरी होत्या आणि हे समजल्यावर सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. मग थोडावेळ भीती घालवण्यासाठी परत गाणी वगैरे म्हणून झोपायला गेलो. सकाळी उठून तारामती शिखर आणि निसर्गाची अप्रतिम रचना म्हणजेच कोकणकडा बघायचं ठरवलं होतं.

 दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रातर्विधी वगैरे आटपून चहा नाष्टा करून तारामती शिखर आणि कोकणकडा बघण्यासाठी निघालो. 
 ४) तारामती शिखर -: तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. याची उंची साधारणत ४८५० फूट आहे. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुहेत गणेशाची सुमारे साडेआठ फूटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. (याच गुहेत आम्ही राहत होतो.) याच गणेश गुहेच्या आजुबाजूला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्या समोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाइनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुख आढळतात. माथ्यावर दोन ते तीन शिवलिंग आढळतात.
 ५) कोकणकडा -: कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण आहे. अर्ध्या किलोमीटर परिघाचा, अर्धगोल आकाराचा, काळाकभिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेवाद्वितीय असावा. कड्याची सरळधार १७०० फूट भरेल. पायथ्यापासून कड्याची उंची साधारणत ४५०० फूट भरते. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे. १८३५ मध्ये कर्नल साइक्सला येथे "इंद्रव्रज" दिसल्याची नोंद आहे. 'इंद्रव्रज' म्हणजे गोलाकार इंद्रधनुष्य होय. पावसाळ्यात ठराविक परिस्थितीत इंद्रवज्र दिसते.
 तारामती शिखर आणि कोकणकडा बघेपर्यंत दुपार झाली होती. ऊन भरपूर वाढलं होतं. परत गुहेत जाऊन जेऊन परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. त्यामुळे मन होत नसताना देखील गुहेत आलो. जेवण करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. गड उतार होताना मागे वळून काल आजच्या आठवणी डोळ्यात साठवून आणि सह्याद्रीशी जुळलेलं हे नातं तुटू न देण्याचं मनाशी पक्क करून चालायला सुरुवात केली. उतरताना मी आणि अजिंक्य सगळ्यात पुढे होतो. बाकीचे जास्त मागे नव्हते साधारण हाकेच्या अंतरावर असतील. गाव जवळ यायच्या आधी मला आणि अजिंक्यला दहा पंधरा फूट पुढे दोन अडीच फुटाची आकृती वळवळत आमच्या समोरुन जाताना दिसली मी आणि अजिंक्यने धावत जाऊन बघितलं तर एक काळा अंगावर सफेद आडव्या पट्टया असलेला साप होता. तेव्हा सापांबद्दल माहिती नसल्याने तो कोणता? विषारी की बिन विषारी हे माहित नसल्याने कोणताही आगाऊपणा न करता बाकीच्यांना पण तो बघता यावा म्हणून त्यांना आवाज दिला. ते धावत आले देखील पण तो पर्यंत तो साप झुडपात दिसेनासा झाला होता. (नंतर काही वर्षांनी समजलं की तो मण्यार जातीचा विषारी साप होता.) त्यामुळे पुन्हा चालायला सुरुवात करून गाव गाठलं. गावात एका हॉटेलात चहा नाश्ता करून खुबी फाटा गाठला. खुबी फाट्याला बसची वाट बघू लागलो पण बराच वेळ बस न आल्याने दिसेल त्या गाडीला हात दाखवून थांबायचा प्रयत्न केला. शेवटी एक भाजीचा टेम्पो थांबला व त्याने शहाड, कल्याण पर्यंत सोडण्याचे कबुल केल्यावर आम्ही टेम्पमध्ये भाजीच्या गोण्यांवर बॅगा आणि अंग अक्षरशः टाकून दिलं. दमलेलो असल्याने झोप लागली आणि शहाड कधी आलं समजलंच नाही. 
या ट्रेकला माझ्यासोबत कौस्तुभ खडीकर, आदित्य कानेटकर, अजिंक्य कानेटकर, स्वप्निल कुलकर्णी, स्वप्निल भावसार, प्रसाद निगडे, हृषीकेश कारखानीस आणि गौरव पांढरकामे हे माझे सवंगडी होते.
ऐतिहासिक माहिती स्रोत -: www.trekshitiz.com, 
Google
फोटो स्रोत -: Google, श्री. संजय लोकरे आणि काही आम्ही काढलेले 
हरिश्चंद्रगड नकाशाची लिंक -: हरिश्चंद्रगड नकाशा

35 comments:

  1. मित्रा ब्लॉग तर खुपच छान आणि अप्रतिम सादर केलीयस. तसेच माहिती आणि फोटो यांची सांगड छानरित्या मांडलीय.माझ्याकडुन म्हणशील तर छानसा प्रयत्न...
    असेच तुझे अनुभव शेअर करुन नवोदितांना प्रेरणा घेऊ देत. तुमच्यीकडुन धाडसी ट्रेक माहिती मिळेल हि अपेक्षा करुन तुम्हाला पुढिल ब्लॉगसाठि भरपुर शुभेच्छा देतो.

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच मित्रा. आणि खूप धन्यवाद

      Delete
  2. मस्त लिहिला आहेस . लिहित राहा

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. नक्कीच अजून चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न असेल.

      Delete
  3. Mast mitra..aplya old memories ahet ya.. thanks

    ReplyDelete
  4. सुदर्शन काय मस्त लिहिलंयस!प्रत्यक्ष जाऊन आलो असं वाटलं!!👍असाच लिहीत जा!
    !

    ReplyDelete
  5. 👌मस्त लिहलं आहे, वाचून आनंद झाला, असे ब्लॉग लिहत राहा 👍

    ReplyDelete
  6. लिहिण्याचा प्रथम अनुभव अप्रतिम आहे

    ReplyDelete
  7. very nice Sudya....
    keep it up.....

    ReplyDelete
  8. very nice Sudya....
    keep it up....
    -Khadya...

    ReplyDelete
  9. Rakesh Manjarekar4 May 2020 at 08:58

    खूप चांगली माहिती. पहिला प्रयत्न असून ही छान लिहिले आहेस मित्रा. असाच लिहीत राहा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा

      Delete
    2. Nicely written Sudarshan. All old memories flashed in few seconds.

      Delete
    3. Thanks Ajinkya, I will try to recollect rest of our memories just like this.

      Delete
  10. गडाबद्दल अतिशय उपयुक्त माहिती शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद🙏

    ReplyDelete
  11. Mastaa....
    -Archis

    ReplyDelete
  12. धन्यवाद मित्रा

    ReplyDelete
  13. खूपच सुंदर अनुभव कथन

    ReplyDelete
  14. छान अनुभव आणि माहिती

    ReplyDelete

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल...