Saturday, 31 December 2022

तोरणा -राजगड २०२२

 या वर्षी दिवाळीच्या आधी किल्ले बांधायला सुरुवात झाली तसा ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. तोरणा - राजगड, राजगड - रायगड असे अनेक प्लॅन डोक्यात येऊन गेले. शेवटी तोरणा ते राजगड हा ट्रेक करायचे फायनल झाले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाऊया असे ठरले. अपूर्वने एक कल्पना दिली आपण ट्रेनने जाण्यापेक्षा बसने जाऊया. नेहमी आम्ही ट्रेनने पुणे, पुणे स्टेशन ते कात्रज रिक्षा, कात्रज ते नसरापूर फाटा पेपर गाडी अथवा वडाप, नसरापूर फाटा ते वेल्हे गाव वडाप असा प्रवास करायचो. पण बसने डायरेक्ट वाशी ते नसरापूर फाटा असा प्रवास होणार होता. तिथून पुढे जाण्यासाठी गाडीची सोय करायची एवढंच राहणार होतं. ओळखी ओळखीतून वेल्हे गावातील एका हॉटेलचा नं. मिळाला. त्यांच्या मदतीने दोन गाडीवाल्यांचे नं. मिळाले. त्यांच्याशी बोलणं झालं. शेवटी हो नाही करता करता आरंभी शूर गळून पडले आणि बाकी सर्वांनी आपले येण्याचे नक्की केले. पण आनंदाची बाब एक होती पन्हाळा ते विशाळगड या ट्रेक (१९) पेक्षा १ जण ह्या वेळेस वाढला होता. तरी पन्हाळा ते विशाळगडसाठी आलेल्यांपैकी २ जण पुढील शिक्षणासाठी परदेशात असल्याने ते (ऋत्विक आणि शुभम बोरवणकर), एकाने काही वैयक्तिक कारणांमुळे (हृषी जोशी), एकजण परीक्षा असल्यामुळे (सुमेध खुजे) आणि एकाच नुकतंच लग्न झालं असल्याने तो (अक्षय रासकर) असे ५ जण कमी झाले होते.

 डिसेंबरच्या सुरुवातीला शुभमने २० जणांची बसची तिकिटं काढली. दिनांक २३/१२/२०२२ रात्रौ ००.४५ ला वाशी येथे बस येणार होती. डिसेंबरच्या मध्यापर्यंत अजून २ जण अजिंक्य खाडिलकर आणि सचिन कुऱ्हाडे यायला तयार झाले. आता २२ जण झालो होतो. पण अचानक आदित्यला काही कौटुंबिक कारणास्तव येणे टाळावे लागले. तो बाहेर पडला तसा वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीला कॅन्सल झालेला हृषी येण्यासाठी तयार झाला. त्यामुळे आकडा पुन्हा वाढून २२ झाला. सगळं सुरळीत झालं तर मजा कशी येणार? आपल्याकडे एक म्हण आहे 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न'. जायच्या ४-५ दिवस आधी राशी आजारी पडली. राशी नाही म्हणून अपूर्वा अशा दोघी कॅन्सल झाल्या. पुन्हा विवेक सिंग अचानक वाढला. शेवटी एकदाचा आकडा २१ वर येऊन स्थिरावला.

 ठरल्याप्रमाणे २२ तारखेला रात्रौ १०.०० वा. सहनिवसातील मंदिरात जमा झालो. थोडं फार सामान काही जणांच्या बॅगमध्ये भरायचे होते ते भरून ठाकुर्ली ते वाशी प्रवास सुरु केला. रात्रौ १२.४५ ची बस असल्यामुळे वेळेत तिथे पोहचू यावर भर दिला आणि पोहोचलो. तिथे गेल्यावर समजले बस साधारण एक तास उशिराने आहे. झालं तिथे बसून मच्छर मारण्याव्यतिरिक्त कामंच काय? तरी काही मुलांनी तिथे बुर्जी पाव, आम्लेट यावर ताव मारला तर शाकाहारी मुलांनी शाकाहारी हॉटेल शोधून तिथे ताव मारला. सरतेशेवटी १.३० वाजता आमची बस आली. सर्व मुलांनी आपापल्या जागा घेतल्या आणि विसावले. बस निघाली आणि आमचा प्रवास सुरु झाला. पण सुखकर झाला तर तो आमचा प्रवास कसला? घाट सुरू झाला तसं ट्रॅफिक जॅम झालं. त्यांतच दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे आमची बस घाटाच्या सुरवातीच्या चढणावरच बंद पडली. साधारण दोन तीन मिनिटे बस सुरूच होईना. मनात विचार आला झालं आपला ट्रेक इथेच होणार बहुतेक. पण सुदैवाने ड्राइवरच्या कौशल्याने बस लवकर सुरू झाली आणि आमचा प्रवास हळूहळू का होईना पण सुरू झाला. पुन्हा घाटात दोन ते तीन वेळा बस बंद पडणार होती पण ड्रायव्हरने बस बंद पडू न देता पुढे नेली. पुणे येईपर्यंत ट्रॅफिक ओसरलं होतं. पुणे पार केल्यावर ड्रायव्हरला डुलकी लागायला लागली पण त्याने कंडक्टरला सांगितले आणि पुढील प्रवासात कंडक्टरने बस चालवली. साधारण एक तास उशिराने आम्ही नसरापूर फाट्याला पोहोचलो होतो. आधीच ठरवलेले वडाप वाले तिथे येऊन अगोदरच उभे होते. बस मधून उतरून अक्षरशः सामानाच्या गोण्या जशा गाडीत कोंबतात तसे बॅगा व स्वतःला कोंबून वेल्हे गावापर्यंतचा प्रवास केला. साधारण ७.१५ पर्यंत वेल्हे गावात पोहोचलो.

 वेल्हे गावात पोहोचलो तर एक गाडीवाला गाडी घेऊन नवीन झालेल्या पार्किंग पर्यंत गेला तर एकाने आम्ही बसलेलो त्या गाडीवाल्याने आम्हाला वेल्हे गावात ज्या हॉटेलवाल्यामुळे त्यांच्या गाड्या मिळाल्या तिथे सोडले. काहीजण डायरेक्ट पार्किंगपर्यंत जाऊन ट्रेक सुरू करावा असे म्हणत होते. पण हॉटेलवाल्याला आधीच नाश्ता आणि चहा घेऊ असे सांगितले असल्याने ते टाळणे मला योग्य वाटले नाही. हॉटेल अजूनही बंदच होते. हॉटेलवाल्याला फोन केल्यावर ५ मिनिटांनी त्याने हॉटेल उघडले. सर्वांसाठी पोहे आणि चहा सांगितलेला होता तो होईपर्यंत दोन तास गेले. साधारण ९.०० ते ९.३० पर्यंत तोरणा किल्ला चढायला सुरुवात केली. पहिला अंगावरचा चढ आज एवढा मोठा वाटत होता की आपल्याने ट्रेक होईल का नाही असे मनात येत होते. याला कारणं पण बरीच होती. एकतर साधारण तीन वर्षांनी ट्रेक करत होतो. वयाची ४० वर्ष पूर्ण होऊन गेलेली आणि प्रवासात रात्रभर बस, ट्रॅफिक च्या समस्या व गाडीवाल्यांशी सतत संपर्कात राहात होतो त्यामुळे झोप झाली नव्हती. यामुळे शरीरात थकवा होता. जो किल्ला चढायला अडीच ते तीन तास लागत होते तिथे आज मला पाच तास लागले. साधारण १.०० वा. सुमारास मी तोरणा किल्ल्यावर पोहोचलो. भर उन्हात चालल्यामुळे डोकं दुखायला लागलं होतं. आम्ही गडावर पोहोचेपर्यंत तरुण मंडळी किल्ल्यावर जाऊन झुंजार माची बघायला गेली सुध्दा होती. आम्ही येऊन स्थिरस्थावर होई पर्यंत मुलं आली. दुपारच्या जेवणासाठी आणलेले पराठे खाऊन थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही लागली नाही. त्यामुळे पाहिजे तसा आराम करता आला नाही. संध्याकाळी आम्ही म्हातारी (शब्दशः अर्थ घेऊ नये) मंडळी झुंजार माची बघण्यासाठी गेलो. पण पूर्वीची शरीरातील लवचिकता आणि आताची यात फरक पडला हे जाणवल्यामुळे आमच्यातले फक्त सचिन पूर्ण झुंजार माची बघून आले आणि आम्ही ते आल्यावर अर्धवट माची बघून निघून आलो. तिथून निघून बुधला माचीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कोकण दरवाजावरील बुरुजावरून सूर्यास्त बघायला आलो. सूर्यास्त बघून मंदिरात आलो पण एव्हाना माझं डोकं भयंकर दुखायला लागलं होतं. पित्ताचा त्रास होत होता. असं वाटत होतं की सर्वांना घेऊन इथून तोरणा किल्ल्यावरून राजगडला घेऊन जाणे जमेल की नाही? तसेच मला एवढं चालायला जमेल की नाही? शेवटी जेवणा अगोदर खवळलेलं पित्त बाहेर निघालं तेव्हा कुठे थोडं बरं वाटायला लागलं. मी झोपलेलो असताना सर्वांनी मस्त भेळ करून खाल्ली आणि कांदा बटाटा रस्सा आणि भात जेवणासाठी करून ठेवले. जेवण तयार झाल्यावर जेवण उरकून घेतले. मी औषध घेऊन झोपून गेलो. भांडी घासून, सगळं आवरून सगळे झोपून गेले.

 साधारण सकाळी प्रणवचा आवाज आला, "तेजस काका ६.२० झाले". तसे एकदम जाग आली. तेजस, मी आणि मग हळूहळू सगळेच उठले. सगळ्यांनी पटापट आवरायला सुरुवात केली. तोपर्यंत मी, अभि आणि ऋषी (बिरंबोळे बंधू) यांनी चहा बनवून घेतला. चहा बिस्कीट खाऊन, आवरून, मंदिराची साफसफाई करून साडे आठच्या सुमारास मंदिरातून निघून बुधला माची मार्गे आम्ही राजगडाकडे प्रयाण केले. बुधला माचीवरील एका एक्सपोजर असलेल्या पॅचला अभि (जोशी) आणि शुभम यांनी इतरांना मदत करत पॅच पार करून दिला. तोपर्यंत मी, अक्षय आणि तेजस यांनी रोपचा गुंता झाला होता तो सोडवून नीट बांधून घेतला जेणेकरून पुढे शिडीच्या इथे जास्त वेळ जाणार नाही. पुढे सगळे ज्या बुरुजावरून खाली उतरायचे होते तेथे जाऊन तयार होते. विकी आणि वहिनी शिडीजवळ पोहोचलेले तेव्हा मी आणि अभि (जोशी) शिडीजवळ गेलो. अभिने रोप बांधून घेतला. मी शिडी उतरून शिडीच्या बरोबर खाली उतरून जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी थांबलो. विकी, वहिनी खाली उतरून व्यवस्थित जागेवर गेल्यावर अभि (बिरंबोळे) खाली आला आणि शिडीच्या खालच्या जागेवर रॉक पॅच संपतो तिथे बाकीच्यांना मदत करण्यासाठी उभा राहिला. मग हळूहळू अजिंक्य (खाडिलकर), प्रथमेश, विवेक, सचिन असे करत सगळ्यांनी तो पॅच व्यवस्थित पार केला. शेवटी अभि (जोशी), शुभम आणि अप्पू (देवकर) तिघेच उरले असताना अभिने मला पुढे जायला सांगितले. पहिले उतरलेले सगळे पुढे निघाले होते. मी, तेजस, हृषी (जोशी) आम्ही ही पुढे निघालो. आमच्या मागे अभि (जोशी), श्रेयस, अक्षय, अप्पू आणि शुभम आमच्या मागे होते.

 आता सगळ्यांनी तोरणावरून राजगडला जाणाऱ्या सोंडेवर चालायला सुरुवात केली होती. आशु सगळ्यात पुढे प्रथमेश, विवेक, अजिंक्य, पार्थ, प्रणव, सचिन हे होते. त्यांच्या मागे शौनक, सुमित हे होते. त्यांच्या मागे विकी आणि वहिनी. त्यांच्या मागे मी, तेजस आणि हृषी होतो. आमच्या मागे दोन्ही बिरंबोळे बंधू, अभि, श्रेयस, अप्पू आणि शुभम होते. दोन तीन टेकाडं पार केल्यावर लिंबू सरबत वाला एक मुलगा भेटला त्याच्याकडे लिंबूपाणी पिऊन पुढे चालायला लागलो तेव्हा आमच्या मागे असलेले सहा जण आम्हाला मागे टाकून पुढे निघून गेले. पुढे कचरे मामांच्या घराआधी उतारावर अजून एक घर लागतं तिथे मुलांनी पाणी आणि लिंबूपाणी मागवलेलं ते पिऊन पुढे निघालो. साधारण पंधरा वीस मिनिटे चालल्यावर कचरे मामांच्या घराजवळ पोहोचलो. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत आशु, प्रथमेश, अजिंक्य, पार्थ आणि विवेक तिथून पुढे निघाले होते. तिथे थांबलो तेव्हा सर्वांच्या पोटात कावळ्यांनी कल्ला केला होता म्हणून आमच्या चापचूप गाईजचे सेलेब्रिटी शेफ तेजस दादा बांदेकर यांनी चापचूप स्पेशल भेळ बनवली. ती खाऊन, पाणी पिऊन आणि थोडा आराम करून आम्ही पुढे निघालो.

 अभि (जोशी), शुभम वगैरे आमच्या पुढे निघून गेले. आम्ही जुनी मंडळी आमच्या वेगाने हळूहळू पुढे चालत होतो. तिथून साधारण एक - दीड तासात आम्ही राजगड चढाईच्या आधीच्या खिंडीत येऊन पोहोचलो. एव्हाना विकी आणि वहिनी थोडे मागे पडले होते त्यामुळे आम्ही खिंडीत थोडा आराम केला. तिथून तेजस आणि सचिन यांना हळूहळू पुढे व्हायला सांगितले व मी आणि हृषी विकी आणि वहिनींसाठी मागे थांबलो. ते आल्यावर पाचेक मिनिटे त्यांचा आराम झाल्यावर आम्ही शेवटची चढाई सुरू केली. एकमेकांना मदत करत आम्ही साधारण एका तासात म्हणजे साधारण ५.३० पर्यंत राजगडाच्या संजीवनी माचीवर पोहोचलो.

 राजगडाच्या संजीवनी माचीवर पोहोचल्यावर तेथील एका बुरुजावर बसून मी, तेजस आणि सचिन यांनी सूर्यास्त बघितला. आमच्या पुढच्या बुरुजावर आशु आणि प्रथमेश बसले होते. त्यांच्या थोडं मागे अळू दरवाजातून आत आलेल्या रस्त्यावर विकी, वहिनी आणि हृषी हे आराम करत बसले होते. सूर्यास्त झाल्यावर आम्ही पद्मावती माचीकडे निघालो जिथे बाकीचे टेंट लावण्याची सोय करण्यासाठी पुढे गेले होते. पद्मावती माचीवर पोहोचल्यावर बघतो तर टेंट लावण्यासाठी चांगली जागा न मिळाल्याने मुलं अजूनही जागा शोधत होते. शेवटी आम्ही महाराणी सईबाई साहेबांच्या समाधीजवळ उभारलेल्या नवीन इमारतीच्या मागे थोड्या घाणेरड्या पण टेंट लागेल अश्या जागेवर आमचे टेंट लावले. एवढा ट्रेक केल्यावर जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यामुळे आम्ही तेथील एका कुटुंबास आमच्याकडील सामान दिले आणि लगेच खायला मॅगी, रात्री जेवणास भाताची खिचडी आणि सकाळी नाश्त्याला पोहे असा मेनू बनवून देण्यास सांगितले. त्यांनी योग्य तो मोबदला घेऊन आम्हाला सर्व गोष्टी बनवून दिल्या. रात्री जेवण झाल्यावर असे लक्षात आले की सकाळी सुवेळा माचीवर जाऊन सूर्योदय बघण्याचा मनसुभा जवळपास बारगळला होता.

 सकाळी उठलो तेव्हा सूर्योदय होऊन गेला होता. त्यामुळे काहीजण बालेकिल्ला बघायला निघून गेले जाताना ज्या कुटुंबाला पोहे बनवायला सांगितले होते त्यांना आठवण करून दिली. तोपर्यंत आम्ही खाली थांबलेल्यांनी टेंट काढून,  भांडी घासून, बालेकिल्ल्यावर गेलेले सोडून बाकी सर्वांच्या बॅगा भरून घेतल्या. तासाभरात बालेकिल्ला बघायला गेलेले परत आले. ते आल्यावर पोहे खाऊन आम्ही राजगड किल्ला उतरायला सुरुवात केली. उतरताना गाडीवाल्याला फोन करून साधारण २.०० वाजेपर्यंत पायथ्याच्या गुंजवणे गावात येण्यास सांगितले. किल्ल्यावरून उतरताना असे वाटत होते की जसं काही किल्ल्यावर फॅशन शो असावा. कारण किल्ल्यावर चढाई करीत असलेल्या बऱ्याच जणांनी नवनवीन फॅशनेबल कपडे आणि पायताण घातली होती. काही मुलींनी तर one piece आणि तत्सम कपडे व high heels आणि तत्सम फॅशनेबल पायताणे घातली होती. म्हणजे आपण कुठे जातोय? कश्याप्रकारचे कपडे आणि पायताण घालायला हवी याचे ही या लोकांना ज्ञान नसावे याचे नवलच वाटले. साधारण १२.०० ते १२.४५ पर्यंत सर्वजण खालती पोहोचलो. सगळ्यात आधी खालती उतरलेल्या आशुने ट्रेकचे व्यवहार सांभाळणाऱ्या शुभमशी बोलून सर्वांसाठी हॉटेल सुवेळा दर्शन येथे जेवणाची ऑर्डर देऊन ठेवली.
जेवण उरकले तोपर्यंत गाड्या येऊन उभ्या राहिल्या पण हायवेला पोलिस चेकिंग असल्यामुळे गाडीवाल्यांनी आम्हाला कात्रजपर्यंत न सोडता साधारण ९ किमी अंतरावर असलेल्या विंजर गावात सोडतो असे सांगितले तिथून आम्हाला नसरापूर फाटा, कात्रज किंवा स्वारगेट येथे जाण्यास गाडी मिळेल असे सांगितले. इथून बाहेर पडणे गरजेचे होते आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने आम्ही विंजर गावापर्यंत गाडीने गेलो. तिथे दहा मिनिटे वाट बघितल्यावर एक बस आली ती आम्हाला नसरापूर फाट्याला सोडणार होती. नसरापूर फाट्याला पोहोचतो न पोहोचतो तोच समोर स्वारगेटला जाणारी बस उभी दिसली ती चुकणार असे वाटल्याने तेजस आणि इतर काही मुलांनी बसमधूनच समोरच्या स्वारगेटला जाणाऱ्या बसच्या दिशेने आवाज देत कल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून आम्ही असलेल्या बस ड्रायव्हरने पटकन बस स्वारगेट बसच्या बरोबर बाजूला उभी करून त्याला पुढे जाण्यापासून रोखले. त्यामुळे ती स्वारगेट बस आम्हाला मिळाली. बसमध्ये बसून आम्ही स्वारगेटला जाण्यासाठी प्रवास सुरु केला. पुढे कात्रज टोल नाक्याजवळ पोहोचलो असता बाजूने तेजसला परळ बस जाताना दिसली. टोल नाका असल्याने ट्रॅफिक होते. तेजसने आपली बॅग आमच्याकडेच ठेवत धावत चालत्या बसमधून उतरून धावत परेल बस गाठली आणि टोल नाका पार करून ती बस आम्ही येईपर्यंत थांबवून ठेवली. तेजसने इशारा करताच आम्ही सगळे स्वारगेट बसमधून उतरून पटापट परेल बस पकडली. तेजसच्या फुर्तीमुळे आमचे साधारण दोन तास वाचल्यामुळे तेजसच्या नावाने जयजयकार करत मुलांनी बसमध्ये धुमाकूळ घातला. विकी आणि वहिनी घटकोपरला उतरणार असल्याने त्या दोघांचे चेंबूर आणि बाकी आम्ही १९ जणांचे वाशी तिकिट काढले व वाशीपर्यंतचा प्रवास सुरु झाला. ८.३० - ८.४५ च्या आसपास आम्ही वाशीला पोहोचलो. तिथून रेल्वे स्थानकाबाहेरील बस स्टँडवरून डोंबिवली बस पकडण्यास जात होतो. बस स्टँडवरून बस बाहेर पडून हायवेला लागतात तो रस्ता पार करून पुढे जातंच होतो तेवढ्यात सचिनना वाशी ते डोंबिवली बस जाताना दिसली ती थांबवून त्यांनी आम्हा सगळ्यांना आवाज दिला. आणि शेवटचा पण कंटाळवाणा प्रवास सुरु केला. कारण बसमध्ये चढल्यावर समजले की शिळ फाटा येथे भयंकर ट्रॅफिक आहे. साधारण ११.०० च्या सुमारास आम्ही मंजुनाथ शाळेजवळ उतरून पायी सहनिवसातील मंदिर गाठले. एकमेकांचा निरोप घेऊन सर्वजण आपापल्या घरी गेलो.

 अश्याप्रकारे आमचा ट्रेक व्यवस्थित पार पडला. या ट्रेकला तेजस बांदेकर, हृषीकेश जोशी, अभिषेक जोशी, शुभम खुजे, अभिषेक बिरंबोळे, ऋषिकेश बिरंबोळे, आशिष बिरंबोळे, प्रथमेश सौंदळकर, अजिंक्य खाडिलकर, विवेक सिंग, सचिन कुऱ्हाडे, सुमित फडके, पार्थ वैष्णव, विक्रम पवार, सौ. विधिश्री विक्रम पवार, श्रेयस वैद्य, शौनक जोशी, अपूर्व देवकर, अक्षय भोसले, प्रणव पाटिल आणि मी असे आम्ही २१ जण होतो.


1 comment:

  1. अप्रतिम लेखणी. ह्या ट्रेकमध्ये मी पण सहभागी होतो त्यामुळे ह्याचा अनुभव कायम स्मरणात राहील.राजगडच्या शेवटच्या कातळ भिंतीचा तो पॅच माझ्या बायकोला क्षणात सर्व काही सांगून गेला.आपले आभार मानावे तेवढे थोडेच. असेच ट्रेक करत रहा आणि आम्हा दोघांना येण्याची संधी मिळू द्यावी ही नम्र विनंती.
    आणि हो तुमचे लिखाण असेच अविरत
    चालू राहू द्या.

    ReplyDelete

राजगड तोरणा लिंगाणा रायगड

 गणपतीनंतर नेहमीप्रमाणे ट्रेकला जाण्याचा विषय सुरू झाला. मागच्या वर्षी आम्ही किल्ले साल्हेर आणि सालोटा केले होते त्यामुळे यावर्षी किल्ले मुल...